औरंगाबाद : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान; हताश शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात संपवले जीवन

औरंगाबाद : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान; हताश शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात संपवले जीवन

Published on

पाचोड (जि. औरंगाबाद) ; पुढारी वृत्तसेवा : सततच्या पावसामुळे शेती पिकांचे झालेले अतोनात नुकसान पाहून हताश झालेल्या एका कर्जबाजारी शेकऱ्याने स्वतःच्या शेतात जाऊन  विषारी औषध प्राशन करुन मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथे शुक्रवारी उघडकीस आली.

बाबासाहेब यशवंतराव काळे वय( ५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक विवाहित मुलगा असा परिवार आहे. या घटनेबदल सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोळी बोडखा ता.पैठण येथील ५५ वर्षीय शेतकरी बाबासाहेब काळे यांनी शेतीवर लाखो रुपयांचे कर्ज एसबीआय बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतले होते.

दरम्यान शेतात कपाशी व तूरीचे पिके उत्तम अवस्थेत आलेली असतांना अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे डोळ्यादेखत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सततच्या पावसाने पिके कुजल्याने  हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतातील नासाडीमुळे  शेतकरी बाबासाहेब काळे हे हवालदिल झाले होते. शेतीतून उत्पन्न निघण्याची आशा मावळली होती.

अशा स्थितीत बँकेचे कर्ज कसे फेडायचे? या मानसिक तणावाखाली ते वावरत होते. शुक्रवारी सकाळी आपल्या शेतात पिकांची परिस्थिती पाहायला गेले होते. पिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांचा धीर सुटला अन आलेल्या नैराश्यातून त्यांनी टोकाची भूमिका घेत विषारी औषधी प्राशन केले.

घरच्यांना ही बाब कळताच त्यांना तातडीने पाचोड ग्रामीण रुणालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दुपारी शोकाकुळ वातावरणात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news