हिंगोली : आखाडा बाळापूर ‘बोगस मजूर’ प्रकरणी पोलिसांकडून कार्यवाहीसंदर्भात टाळाटाळ | पुढारी

हिंगोली : आखाडा बाळापूर 'बोगस मजूर' प्रकरणी पोलिसांकडून कार्यवाहीसंदर्भात टाळाटाळ

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : कामगार कार्यालय हिंगोली यांच्याकडे आखाडा बाळापूर ग्रामपंचायत ग्रामविकास आधिका-यांच्या सही शिक्क्याचे बनावट फॉर्म भरले गेले आहेत. यामध्ये बोगस बांधकाम कामगार व रोहयो मजूर दाखवून मजुराचा वैयक्तिक लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बोगस बांधकाम एजन्सीचे मजूर दाखवून प्रमाणपत्र व फॉर्म देऊन कामगार कार्यालयाकडून लाभ मिळवला. ‘दैनिक पुढारी’ने हे सर्व प्रकरण उजेडात आणताच, या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु  कर्मचारी मोकाट फिरत असून याबाबत  पोलिसांकडून कारवाई केली जात नाही.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, बांधकाम कामगार तसेच रोजगार हमी योजनेतील मजुरांना मध्यान व भोजन व कामगारांना एक कामावरील किट. तसेच कामगार यांची पत्नी अथवा कामगार महिलाची प्रसूती झाली असता मिळणारा तीस हजार रुपये मिळतात. मुलांना शिष्यवृत्ती विमा आणखी वैयक्तिक लाभ आणि आपल्‍याकडे शेती असून अशा व्यक्तींनी आपल्या पत्नींना व घरातील महिला सदस्यांना रोजगार हमी योजनेतील व बांधकाम कामावरील मजूर दाखवून मोठा लाभ घेतला आहे.

आखाडा बाळापूर येथे मजुरांचे मध्यानभोजन येत होते. ग्रामपंचायतमध्ये हे भोजन कोणसाठी आणि का येत आहे, ही कोणती योजना आहे याबाबत पाहिले गेले. यानंतर मोठा खुलासा समोर आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने ग्रामविकास अधिकाऱ्याचा बनावट शिक्का व सही मारून बोगस कामगारांच्या नावे कामगार प्रमाणपत्र दाखवले होते. यानंतर या संपूर्ण प्रकार समोर आला.

गरजू मजूर अनेक लाभांपासून आजही वंचित

अनेकांनी हा लाभ घेण्याचा प्रयत्न करून फॉर्म भरण्यासाठी कामगार कार्यालयाचे दलाल विविध ग्रामपंचायत मधून बांधकाम कामगार व रोजगार हमी मजूरांचे प्रमाणपत्र मिळून दिले आहेत. यामध्ये ग्रामसेवकांना हाताशी धरून पैसे देऊन प्रमाणपत्र काढून घेतले होते. सदर प्रमाणपत्र त्यांनी हिंगोली कामगार कार्यालयाकडे दाखल केले व त्या आधारे मजुरांचा लाभ मिळवून घेतला. विशेष म्हणजे गरजू मजूर अनेक लाभांपासून आजही वंचित आहेत.

या प्रकरणी कर्मचारी रामा सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच हिंगोली कामगार कार्यालयातून परस्पर 400 मजुरांची नावे रद्द करण्यासाठी मुंबई मजूर कामगार कार्यालयात पत्र पाठवण्यात आली आहे. परंतु पोलिसांकडून याबाबत तपास सुरू असून सदरची यादी तपास पूर्ण होईपर्यंत रद्द करण्यात येऊ नये असे पत्र दिल्याने कामगार अधिकाऱ्यांना ही यादी रद्द करता आली नाही. याबाबत ग्रामस्‍थांकडून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. तसेच बोगस आणि फसव्या लोकांना तात्‍काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्‍थांकडून होत आहे.

Back to top button