नांदेड; पुढारी वृत्तसेवा : नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने लावलेल्या जीएसटी प्रणालीमुळे सामान्य माणूस कोलमडून पडला आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकावर केली आहे. शंकरनगरजवळील भोपाळा येथे आयोजित छोटेखानी सभेत ते बोलत होते.
केंद्राने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा काळे धन संपविण्यासाठी नव्हे, तर व्यापारी, शेतकर्यांवरील आर्थिक आक्रमण होते. त्याचे परिणाम देशातील गरीब लोक आजही भोगत आहेत. त्यापाठोपाठ लागू झालेली जीएसटी व्यवस्था अपयशी ठरली, असा आरोप राहुल यांनी केला.
चुकीच्या धोरणामुळे देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचला असून, परस्परांमधील स्नेहभाव नष्ट होताना दिसत आहे, ही देशभक्?तीची भावना नव्हे, असे ते म्हणाले. भाषा, जात, प्रांत, धर्मावर आधारित भेदभाव निर्मितीला प्रोत्साहन दिले जात असून, त्याविरोधात आपली यात्रा असल्याचे त्यांनी सांगितले.