नांदेड : 'भारत जोडो यात्रे'ला महाराष्ट्रात प्रारंभ; बड्या नेत्यांसह अबाल वृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग
देगलूर; पुढारी वृत्तसेवा : भारत जोडो यात्रा तमिळनाडूतून नांदेडच्या देगलूर शहरातून महाराष्ट्रात सोमवारी (दि.०७) पोहचली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. यानंतर राहुल गांधी यांनी वन्नाळी येथील गुरूद्वाराला रात्री 1.45 वाजता भेट दिली. नंतर देगलूर येथेच या यात्रेने मुक्काम केला. दुसर्या दिवशी गुरूवारी (दि.०८) महाष्ट्रातील देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथून सकाळी 8.50 वाजता पुन्हा यात्रेची सुरूवात करत, पुन्हा भारत जोडो यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
LIVE: #BharatJodoYatra | Gurudwara, Degloor to Biloli | Nanded | Maharashtra https://t.co/opyUMy36Td
— Bharat Jodo (@bharatjodo) November 8, 2022
महाराष्ट्रातील देगलूर तालुक्यातून प्रारंभ होत, असलेली भारत जोडो पदयात्रा तालुक्यातील वन्नाळी येथून मंगळवारी (दि. ८) सकाळी 8.50 वाजता प्रारंभ झाला. यामध्ये अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थितीत यात्रेला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान यात्रेत रस्त्याशेजारी अनेक ठिकाणी फुले व पाण्याची सोय करण्यात आली आहे. भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, खासदार रजनीताई पाटील, खासदार कुमार केतकर, आमदार परिणती शिंदे आदींसह अनेक नेते व अबाल वृध्दाचा यामध्ये सहभाग होता.
या यात्रेदरम्यान रस्त्यावरून चालताना राहुल गांधी यांनी शेतात रब्बीची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हात उंचावून प्रतिसाद दिला. तर वन्नाळी येथून श्रीजया चव्हाण ह्या पदयात्रेत सहभागी होत, राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत त्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला. यात्रेत जवळपास 25 हजार नागरिकाचा सहभाग होता. ही पदयात्रा सकाळी ठीक 9.45 वाजता वझरगा येथील तयार करण्यात आलेल्या विश्रांतीगृहात पोहोचली. तेथे सर्व नेते व पदाधिकाऱ्यांच्या नाश्ता व विश्रांतीची सोय करण्यात आली आहे. पुढील पदयात्रा हि दुपारी 3.00 ते 4.00 वाजता शंकरनगरकडे रवाना होणार आहे.