बीड: कापूस वेचणीला मजूर देता का मजूर? : शेतकरी चिंताक्रांत
बीड, पुढारी वृत्तसेवा : कापूस शेतकऱ्याचे नगदी पीक आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड करतात. मात्र, यंदा दिवाळीनंतर बाहेरगावातील मजूर कापूस वेचणीला आले नाहीत. त्यामुळे लाख मोलाचे पांढरे सोने मजुरांअभावी शेतातच आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. मात्र काबाडकष्ट मेहनत करून पिकवलेला कापूस वेचून घरी आणता यावा यासाठी शेतकरी मजुरांच्या शोधात फिरताना दिसत आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे जगाचा पोशिंदा असणा-या शेतकरी राजा संकटात आहे.
उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. अशातच वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मागील चार वर्षात बोंड अळी मुळे कापसाचे उत्पादन कमालीचा घटला आहे यंदा बोंड आळी आली नसली तरी शेतकऱ्याच्या हाताशी आलेला कापूस अजूनही मजूर मिळत नसल्याने झाडावरच मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे .कापूस वेचणी करायला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्याचे पांढरे सोने अजूनही शेतातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे खूप मोठे संकट उभा आहे.
शेतकरी राजा घरातील बच्चे कंपनीला हताशी घेऊन मुलांना दिवाळीमध्ये मामाच्या गावाला न पाठवता शेतातच कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने घेऊन जात आहे. अनेक शेतकरी कापूस वेचणीसाठी मजुराच्या शोधात फिरताना दिसत आहेत
निसर्गाच्या प्रकोपाने हाताशी तोंडाशी आलेला घास गेला जे काही वाचलं आहे त्या साठी आता मजूर जास्त पैसे देऊन ही मिळत नाहीत. यामुळे कापूस वेचणी करायला अवघड जात आहे.
– भाऊसाहेब आटपाळे, शेतकरी माटेगाव
हेही वाचा
बेळगाव : मध्यवर्ती समितीकडून प्रा. भारती पाटील यांचा सत्कार
सेटवर नाश्ता मिळाला नाही म्हणून या अभिनेत्याने सोडला होता हा सुपरहिट सिनेमा