हिंगोली : 300 क्विंटल तांदूळ, 30 क्विंटल गहू जप्‍त; ग्रामीण पोलिसाची कारवाई | पुढारी

हिंगोली : 300 क्विंटल तांदूळ, 30 क्विंटल गहू जप्‍त; ग्रामीण पोलिसाची कारवाई

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा :  काळ्या बाजारात तांदूळ व गहू विक्रीसाठी नेला जात असताना हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर कारवाई केली. दोन वाहनांसह 300 क्विंटल तांदूळ व 30 क्विंटल गहू यावेळी पोलिसांनी जप्त केला. त्याची किंमत 6.37 लाख रुपये आहे. या प्रकरणी दोघांवर बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातून स्वस्त धान्याचा तांदूळ व गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी एक ट्रक (क्र.एमएच-26-बीई-2892) व मालवाहु बोलोरो जीप (क्र.एमएच-28-एक्स-2823) यांच्या चालकाकडे चौकशी केली. मात्र चालकांनी चौकशीच्या दरम्यान उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी करत वाहनांची तपासणी केली. यावेळी ट्रकमध्ये 300 क्विंटल तांदूळ व बोलोरो पीकअपमध्ये 30 क्विंटल गहू असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार गहु व तांदळासह ही दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या तांदूळाची किंमत 5.70 लाख रुपये तर गव्हाची किंमत 67 हजार रुपये आहे.  ट्रक चालक अमरजितसिंग गवराय (रा. नांदेड), पिकअप चालक प्रकाश श्रीरामे (रा. हिंगोली) यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक केंद्रे, जमादार गजानन पोकळे, आकाश पंडीतकर, अशोक धामणे, संतोष वाढोरे यांनी केली.

 हेही वाचा :

Back to top button