उस्मानाबाद : तुळजाभवानी मातेच्या पौर्णिमा यात्रेसाठी दीड हजार एसटी बसेस सज्ज
उस्मानाबाद; पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी मातेच्या पौर्णिमा यात्रेसाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यभरातील तसेच लगतच्या भाविकांचा ओघ लक्षात घेऊन रविवारी (दि. 9) साठी एसटीने जंगी नियोजन केले आहे. तब्बल दीड हजार एसटी बसेस भाविकांच्या सेवेते असतील.
कोजागरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक तुळजापुरात दाखल होतात. दसरा सणादिवशी सिमोल्लंघन झाल्यानंतर तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा असते. त्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला देवी गाभार्यात येते. या दिवशी देवीच्या दर्शनाला भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यातही कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविकांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळेच यात्रा कालावधीत तुळजापूर ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्गा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असतो. तर औरंगाबाद-सोलापूर मार्गावरील वाहतूक उस्मानाबादहून पर्यायी मार्गाने वळविली जाते.
पौर्णिमा यात्रेसाठी एसटीने औरंगाबाद प्रदेशातून (आठ जिल्ह्यांतून) 900 बसचे नियोजन केले आहे, तर पुणे विभागातून 450 बसेस यात्रेसाठी दाखल झाल्या आहेत. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील स्थानिक बस तसेच कर्नाटक परिवहनच्या बस सेवेत असतील. बार्शी-उस्मानाबाद मार्गावर 100, लातूर मार्गावर 100, गुलबर्गा, बिदर मार्गावर शंभर तर सोलापूर मार्गावर 1050 बस धावणार आहेत. भाविकांनी याची नोंद घेऊन अवैध खासगी वाहतुकीचा पर्याय नाकारावा व सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन एसटीच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा :