हिंगोली : अतिवृष्टीच्या मदतीसाठी पाठविले मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलेले पत्र
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील चार महसूल मंडळांना अतिवृष्टीच्या मदतीच्या यादीतून वगळण्यात आल्याने रोष व्यक्त करत मदतीसाठी नाकतोडा येथील एका शेतकर्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठविले आहे.
तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नामदेव पतंगे यांनी म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री साहेब, आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा सवाल आम्हाला पडला आहे. सेनगाव तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे झाले. तालुका प्रशासनाने 32 कोटी 23 लाख 47 हजार 200 रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना वितरीत करणार असल्याचे सांगितले. परंतु, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, आजेगाव, बाभुळगाव व पुसेगाव या चार मंडळांना मदतीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे येथील शेतकरी निराश झाले. मदतीच्या यादीत चार मंडळांचा समावेश करून अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी.’