नांदेड : सर्वांगीण विकासामध्ये शैक्षणिक धोरण महत्त्वाचे : विकासचंद्र रस्तोगी | पुढारी

नांदेड : सर्वांगीण विकासामध्ये शैक्षणिक धोरण महत्त्वाचे : विकासचंद्र रस्तोगी

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये राष्ट्राचे शैक्षणिक धोरण महत्त्वाचे असणार आहे. असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’ या विषयावर एकदिवसीय सहविचार सभेमध्ये ऑनलाईन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांच्यासमवेत राज्याचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने हेही ऑनलाईन उपस्थित होते.

अधिसभा सभागृहामध्ये व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत भोसले,मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, आंतर विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैयजंता पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना रस्तोगी म्हणाले की, भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे होत आहेत. 2047 रोजी स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यावेळी भारताची शैक्षणिक स्थिती काय राहील याचा विचार आजच आपल्याला करावा लागेल. 25 वर्षे अगोदर त्यावर अभ्यास करून त्याची परिपूर्ण अशी तयारी करावी लागेल.

25 वर्षानंतरच्या शिक्षणाची उपयोगिता उच्च दर्जाची राहण्यासाठी आपल्याला योग्य असे धोरण ठरवावे लागेल. त्यावेळी 25 ते 40वयोगटातील तरुणांमध्ये विशेष कौशल्य किंवा उच्च स्तरातील प्रतिभा निर्माण करण्यासाठी हे शैक्षणिक धोरण महत्वाचे आहे.या धोरणाच्या माध्यमातून आपला तरुण वर्ग बुद्धीमतेच्या जोरावर स्वतःचे राहणीमान आणि देशाची प्रतिभा उंचावण्यासाठी निश्चितच सक्षम असणार आहेत. भविष्यातील आपला तरुण वर्ग हा विशेष कौशल्यासहित आंतरविद्याशाखीय असणार आहे. प्रत्येक दहा वर्षांनी तो आपले ज्ञान अद्ययावत करीत राहणार आहे. आवश्यक ते तंत्रज्ञान अवगत करणार आहे. या सर्व बाबतीत सर्वात महत्त्वाची भूमिका आहे ती शिक्षकांची. विद्यार्थ्यांना घडविण्याच्या आधी शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. इतर देशाच्या तुलनेत आपले सकल नोंदणी प्रमाण हा खूप कमी आहे.

या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020’ द्वारे यामध्ये निश्चितच वाढ होणार आहे. आजही जगातल्या 100 विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. भारतातील टॉपच्या 100 विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील फक्त सात विद्यापीठे आहेत. ही परिस्थिती आपल्याला बदलावयाची आहे. यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांनी या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अधिक मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन या सहविचार सभेमध्ये त्यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. योगिनी सातारकर यांनी केले.

Back to top button