हिंगोली : मच्छिमाराचा पाण्यात बुडून मृत्यू; सुकळीवीर येथील घटना | पुढारी

हिंगोली : मच्छिमाराचा पाण्यात बुडून मृत्यू; सुकळीवीर येथील घटना

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर परिसरातील तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या मच्छीमाराचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यांचा मृतदेह बुधवारी (दि.१५) सकाळी तलावाच्या पाण्यात सापडला आहे. भागोराव मुंजाजी खरवडे असे मृत्यू झालेल्या मच्छिमाराचे नाव आहे आहे.

कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर येथील भागोराव खरवडे हे तलावाच्या बाजूलाच झोपडीमध्ये राहतात. मंगळवारी (दि.१४) दुपारी ते तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत ते परत आले नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर झोपडीमध्येच त्यांचे कपडे सापडल्यामुळे ते तलावात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आली.

दरम्यान, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार शेख बाबर, अमोल अडकिणे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button