राज ठाकरेंची सुद्धा वारी होणार ? आता औरंगाबादमध्येही अजामीनपात्र गुन्हा दाखल
औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘राज’ सभेचे शहर पोलिसांनी संपूर्ण पोर्स्टमार्टेम केलं आहे. पोलीसांनी घालून दिलेल्या अटींचा भंग झाल्याचे समोर आले असून अखेर राज ठाकरे यांच्यासह ज्यांच्या नावाने परवानगी घेण्यात आली होती त्या मनविसेचे जिल्हाध्यक्ष राजीव जेवळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, पोलीस उप निरीक्षक गजानान इंगळे यांनी फिर्याद दिली. त्यावरून कलम ११६, ११७, १५३ भादंवि १९७३ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये राज ठाकरे व राजीव जेवळीकर व इतर आयोजक यांचा समावेश असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक गिरी करीत आहेत.
या होत्या पोलिसांच्या अटी
- सभास्थानाची आसनव्यवस्था 15 हजार नागरिकांची असल्याने त्यापेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करू नये.
- सभेत महिला व पुरुषांची स्वतंत्र आसन व्यवस्था असावी, तेथे स्वच्छता असावी.
- स्वच्छतागृहाचीही सोय करावी.
- कोणतीही व्यक्ती किंवा समुदायाचा अनादार होईल, असे वक्तव्य टाळा.
- सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल, असे व्यक्तव्य करू नये.
- सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करा.
- धर्म, भाषा, जात, वंश यावरून चिथावणी देणारी भाषणे टाळावी.
असे झाले उल्लंघन
- सभेला 30 ते 35 हजार नागरिकांची उपस्थिती होती. विशेष शाखेने ही आकडेवारी अहवालात स्पष्ट केली आहे.
- महिलांची आसन व्यवस्था स्वतंत्र नव्हती. महिलांना पुरुषांच्या गर्दीतूनच ये-जा करावी लागली. त्याचा त्यांना मनस्ताप झाला.
- दोन धर्मांच्या नागरिकांमध्ये कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून केले.
- भोंगे उतरविण्यासाठी 4 मेचा अल्टीमेटम देताना काय ते एकदा होऊनच जाऊ द्या, असे तरुणांना भडकविणारे वक्तव्य राज यांनी केले.
- सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीप्रदुषणाच्या अटी पायदळी तुडविल्या. डेसीबलचा आकडा हा 84 पर्यंत होता.
- दोन धर्मांमध्ये विष कालविण्याचे काम या जाहीर सभेतून उघडपणे झाले.
हे ही वाचलं का ?