

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाचा मूड बदलताना दिसतोय. भारतीय हवामान विभागाने (IMD) 20 ते 24 एप्रिलदरम्यान राज्यात पावसासह वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या अंदाजानंतर प्रशासनानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबई, उपनगरांसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. सोबतच जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
यवतमाळ जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरणानंतर रात्री उशिरा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या बदलामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. तसेच आंबा आणि उन्हाळी पिकांना नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परभणीतही उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक आलेल्या वादळी पावसाने दिलासा दिला. मात्र, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांमुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. ग्रामीण भागात फळबागा आणि भाजीपाला पिकांवर परिणाम होण्याची भीती आहे. विशेषतः गावरान आंब्याचं मोठं नुकसान झाल्याचं प्राथमिक चित्र आहे.
वादळी वातावरणात विजांचा आवाज ऐकू आला किंवा चमक दिसली, तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली, मोकळ्या जागेत किंवा पाण्याजवळ उभं राहणं टाळावं. अशा वेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापरही कमी करावा.
स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आलं असून, शाळा किंवा सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवण्याची तयारी सुरू आहे.
शेतकऱ्यांनी वीजा पडत असताना शेतातील काम टाळावं. बांधकाम क्षेत्रातही काम तात्पुरतं थांबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच मोठे सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.