जयसिंगपूर ; पुढारी वृत्तसेवा : सांगली-कोल्हापूर महामार्गावर अत्यंत खड्डे पडल्याने हा महामार्ग खड्ड्यांचा महामार्ग बनून रस्त्याची चाळण झाल्याचे वृत्त दै. 'पुढारी'ने दि. 22 रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. मात्र, दुसरीकडे केवळ खडी आणि डांबर टाकून विनारोडरोलर खड्डे भरले जात आहेत. हे भरण्यात आलेले खड्डेही पुन्हा उखडण्याची शक्यता आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्ग हा 52 कि.मी.चा असून या मार्गावरील उदगाव-जयसिंगपूर, चिपरी, निमशिरगाव, तमदलगे, जैनापूर, मजले, हातकणंगले, अतिग्रे, माले, हेर्ले, हालोंडी, शिरोली या ठिकाणी 500 हून अधिक खड्डे पडल्याने सातत्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
सध्या तमदलगे खिंडीपासून हातकणंगले ते अतिग्रेपर्यंत खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे.
यात एका टॅक्टरमध्ये खडी व दुसर्यामध्ये क्रश असून फक्त खड्ड्यांत डांबर मारून खडी व खडक टाकले जात आहेत. यावर रोडरोलर न फिरवता केवळ बोळवण सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासदार, आमदार यांनी सांगली-कोल्हापूर महामार्गाचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा शिरोळ तालुक्यातून पुन्हा जनआंदोलन उभारण्याची गरज व्यक्त होत आहे.