शित्तूर वारुण : सतीश नांगरे
चांदोली अभयारण्याच्या सीमेलगत कुंपण नसल्यामुळे शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील खुंदलापूर, मणदूर ते वाकुर्डेपर्यंत व शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील उखळू, शित्तूर वारुण ते तुरुकवाडीपर्यंत वन्यप्राणी थेट मानवी वस्तीत प्रवेश करता येत आहेत. भक्ष्याच्या आमिषाने या व्याघ्र प्रकल्पातील बिबट्यांचा या अभयारण्याला लागून असलेल्या मानवी वस्तीत मुक्तपणे वावर सुरू आहे.
'अभयारण्याऐवजी मानवी वस्तीतल्या शेतशिवारातील उसाचे रान हेच बिबट्याचे सध्या जंगल झाले आहे.' त्यांचा वावर हा नागरिकांच्या जिवावर बेतल्याच्या याआधी अनेक घटना घडल्या आहेत.
देशातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या वाघांचे चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्यात येणार असल्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांतील लोकांच्या सुरक्षेच्याद़ृष्टीने आजपर्यंत कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या व्याघ्र प्रकल्पात वाघ व बिबट्यांचे मुख्य भक्ष्य असलेल्या रानडुक्कर, हरण, चितळ, भेकर किंवा सांबराचीही पुरेशी पैदास नाही. या अभयारण्यामध्ये सध्या केवळ 41 बिबटे आढळून आले असले तरी अभयारण्याबाहेर असलेल्या बिबट्यांची संख्या यापेक्षा कित्येक पटींनी अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यांची दहशत परिसरामध्ये आता सर्वदूर पोहोचली आहे.
या बिबट्यांना जेरबंद करून पुन्हा त्यांच्या प्रकल्प क्षेत्रात सोडण्यासाठी वन्यजीव किंवा वनविभागाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. हे खरे दुखणे आहे. गलेलठ्ठ पगार घेणार्या वन्यजीव व वनविभागातील कर्मचारी व अधिकार्यांना याचे कोणतेच सोयरसूतक नसावे. ही खरी शोकांतिका आहे.