नृसिंहवाडी ; पुढारी वृत्तसेवा : राजू शेट्टींची जलसमाधी परिक्रमा यात्रा : नृसिंहवाडी येथे रविवारी दुपारी पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी येऊन जलसमाधी घेण्यात येणार आहे. यासाठी नृसिंहवाडीला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. यात ५०० हून पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.
राजू शेट्टींची जलसमाधी परिक्रमा यात्रा काल (दि. ०४) अब्दुललाट येथे मुक्कामास होती. त्यानंतर हेरवाडपर्यंत पुन्हा यात्रेला सुरुवात झाली आहे.
नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशानुसार शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड या तीन पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जादा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नृसिंहवाडी बसस्थानक, शिरोळ कुरुंदवाड मार्ग, दत्त मंदिर, कृष्णा पंचगंगा संगम या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शिवाय शनिवारी रात्री शिरोळ पोलिसांनी आंदोलकांना नोटीसा बजावल्या आहेत. शिवाय, रेस्क्यू, बोटी, लाईफ जॅकेट यासह विविध साहित्यही तैनात करण्यात आले आहे.
राज्य सरकारकडे मंत्र्यांना बंगले व गाड्या घ्यायला पैसे आहेत, तर केंद्र सरकारलाही केवळ गुजरातची संकटे दिसतात; मात्र या दोघांनाही महाराष्ट्रातील पूरग्रस्त आणि पूरग्रस्तांचे दुखणे दिसत नाही, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.
राजू शेट्टींना आमदारकी मिळणार, नाही मिळणार यापेक्षा पूरग्रस्तांना वेळेवर मदत देणार काय, त्यांचे प्रश्न संपवणार काय यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाष्य करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
काही लोकांनी मी इचलकरंजीला पाणी देणार नाही, अशी दिशाभूल करून मी पाण्याच्या प्रश्नामध्ये आडवा येतोय म्हणून माझ्याबाबत लोकांचे मन कलुषित केले.
त्याच इचलकरंजीत आज मेघराजाने माझं स्वागत केले. गेल्या दीड वर्षात कुठं आलं पाणी? इचलकरंजीच्या जनतेला मिळाले काय पाणी? एक दिवस इचलकरंजीतील पाण्यासाठी मीच संघर्ष करणार आहे.
फक्त लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला साथ द्यावी, असे आवाहन शेट्टी यांनी केले.