कागल; बा. ल. वंदूरकर : दूधगंगा नदीतील पाणी उपसा करणार्या महाराष्ट्रातील शेतकर्यांना उपसा बंदी आदेश लागू करण्यात आला. मात्र, कर्नाटकातील शेतकर्यांना मात्र पाणी उपसा करण्याकरिता मोकळीक दिली आहे. कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. तेथे मोफत वीज असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. अधिकार्यांच्या या अजब कारभाराची शेतकरी वर्गामध्ये चर्चा सुरू आहे.
पाटबंधारे विभागाने दूधगंगा नदी, डावा – उजवा कालव्यातील पाण्यावर दुसर्यांदा लावलेली उपसा बंदी संपताच पुढील आदेशापर्यंत तिसर्यांदा उपसाबंदी लागू केल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई निर्माण होत आहे. काळम्मावाडी धरणातील पाण्याची पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अधिकार्यांनी बेहिशेबी कारण नसताना यापूर्वी पाणी सोडून देण्यात आले, त्यामुळे पाण्याचा साठा कमी झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पाटबंधारेने दुसर्यांदा उपसाबंदी लागू केली. या काळात माळरान भागातील ऊस वाळू लागला आहे. तसेच पाणी देऊन पेरणी केलेली पिके धोक्यात आलेली आहेत. काही धूळवाफ पेरण्यादेखील धोक्यात आलेल्या आहेत.