इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांत ताराराणी पक्ष 'कमळ' घेऊन रणांगणात उतरणार आहे, असे सष्ट संकेत आमदार प्रकाश आवाडे यांनी दिले आहेत. सोमवारी ताराराणी पक्ष कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत त्यांनी याबाबतचे सूतोवाच केले. आमदार आवाडे यांची ही भूमिका भाजपला बळ देणारी आहे, असे मानले जात आहे. तथापि, माजी आमदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यास कसा आणि कितपत प्रतिसाद देतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश हाळवणकर यांच्याविरोधात निवडून येऊनही आमदार आवाडे यांनी भाजपलाच पाठिंबा देत सर्वांनाच धक्का दिला होता, तर भाजप गोटातही आश्चर्य व्यक्त होत होते. राज्य पातळीवरील भाजप नेत्यांशी चांगले सूत जुळवण्यात आवाडे यशस्वी झाले. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आवाडेंना सोबत घेऊनच रणनीती ठरवली. त्यामुळे आवाडे भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या नजरेसही आले.
एका बाजूला राज्य पातळीवर भाजपशी जवळीक निर्माण झाली असताना, स्थानिक पातळीवर मात्र आवाडेंना भाजपच्या नेत्यांनी कधीच जमवून घेतले नाही. गेल्या अडीच वर्षांत हाळवणकर-आवाडे कधीच एकत्रित आले नाहीत. त्यामुळे भाजपने इचलकरंजी महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत 'शत प्रतिशत लोटस' हे ध्येय ठेवत, मोर्चेबांधणी सुरू केली. त्यामुळे भाजपसोबत असलेले आवाडे काय करणार, याची शहरात उत्कंठा लागू राहिली होती. सोमवारी अनपेक्षितपणे आमदार आवाडे यांनी इचलकरंजीत भाजपचा महापौर होत असेल, तर 'कमळ' असे म्हणत पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली.
नवे राजकीय समीकरण भाजप कार्यकर्त्यांना रुचणार काय?
इचलकरंजी शहराने गेल्या दोन दशकांपासून हाळवणकर-आवाडे यांच्यातील 'सख्य' पाहिले आहे. त्यामुळे आता आवाडे यांनी 'कमळ' हातात घेण्याचा निश्चय केला असला, तरी भाजप कार्यकर्त्यांना तो कितपत रुचतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. यावरच होऊ घातलेले नवीन राजकीय समीकरण अवलंबून आहे.