कोल्हापूर; विकास कांबळे : गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर या योजनेत सामविष्ट असलेल्या गावांनी विरोध करण्यास सुरुवात केल्यामुळे या योजनेचा मार्ग खडतर बनत चालला आहे.
गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना 10 ऑक्टोबर 1997 रोजी कार्यान्वित झाली. यामध्ये उचगाव, मुडशिंगी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, वळिवडे, गोकुळ शिरगाव, कणेरी, मोरेवाडी आदी चौदा गावांचा समावेश होता. ही योजना करत असताना माणसी 55 लिटर प्रमाणे तसेच पुढील वीस-पंचवीस वर्षांत वाढणारी लोकसंख्या गृहित धरण्यात आली होती.
परंतु, या गावांचा विस्तार झपाट्याने होत आहे. 2030 पर्यंत या गावांची लोकसंख्या 1 लाख 40 हजार अशी गृहित धरण्यात आली होती. परंतु, पहिल्या पाच ते दहा वर्षांत लोकसंख्येत तिपट-चौपटीने वाढ झाली आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल जिल्हा परिषदेने करावी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने ती जिल्हा परिषदेला हस्तांतर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अद्याप ही योजना हस्तांतरित झालेली नाही.
पाणीपुरवठा योजनेतील गावांची लोकसंख्या झापट्याने वाढू लागल्यामुळ या गावांना पाणी टंचाई जाणवू लागली. त्यामुळे सुधारित पाणीपुरवठा योजनेची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे माणसी 77 लिटर व पुढील तीस वर्षांची लोकसंख्या गृहित धरून सुधारित वीस गावांचा समावेश असलेला आराखडा तयार करण्यात आला. 140 कोटी 66 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला. आराखडा तयार होऊन त्यातील त्रुटी दूर करण्यात आल्यानंतर 137 कोटी 21 लाखांच्या आराखड्यास जानेवारीमध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. परंतु, आता दहा गावांनी या योजनेत समाविष्ट होण्यास नकार दिला आहे.
आता पुन्हा दहा गावे वगळून आराखडा तयार करावा लागणार आहे. या दहा गावांपैकी आता आणखी काही गावे समाविष्ट करा म्हणून ठराव करत आहेत. गावांच्या या धरसोड वृत्तीमुळे या योजनेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
योजनेत समावेश असणारी गावे
गांधीनगर, वळिवडे, गडमुडशिंगी, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कणेरी, कळंबे तर्फ ठाणे
…या गावांचा योजनेला विरोध
नेर्ली, तामगाव, कणेरीवाडी, सांगवडेवाडी, हलसवडे, चिंचवाड, वसगडे, सांगवडे, कंदलगाव, गोकुळ शिरगाव