कोल्हापूर : भारतीय सुताची निर्यात 28 ते 30 टक्क्यांनी घटणार?
कोल्हापूर; राजेंद्र जोशी : देशांतर्गत कापसाचे वाढलेले भाव आणि जागतिक बाजारात घटलेली मागणी यामुळे भारतीय सूत निर्यात सुमारे 28 ते 30 टक्क्यांनी घटेल, अशी शक्यता केअर एज रेटिंग्ज या संस्थेने व्यक्त केली आहे. या संस्थेचा याविषयीचा एक अहवाल गुरुवारी प्रसिद्ध झाला. या अहवालात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये निर्यातीत 59 टक्के घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारतीय सुताला जगभरातून मागणी असते. यंदा जानेवारी महिन्यात कापसाने उच्चांकी दर गाठला.
1 लाख 10 हजार रुपये प्रतिकांडी (746 किलो) पर्यंत कापसाच्या किमतीचा आलेख चढल्याने बाजारात सूत महाग झाले. परिणामी जागतिक बाजारात दराशी स्पर्धा करण्यात भारतीय सूत उद्योग कमी पडला. यामुळे सुताची अपेक्षित निर्यात होऊ शकली नाही. ऑक्टोबर 2022 मध्ये हे दर प्रतिकांडी 65 हजार रुपयांपर्यंत खाली आले. परंतु, प्रत्यक्षात याच दरम्यान जागतिक बाजारातील मागणी घटली. साहजिकच, त्याचा फटका सूत उद्योगाला बसला आहे. यामुळे आर्थिक वर्षअखेरीस सुताची निर्यात 28 ते 30 टक्क्यांपर्यंत घसरेल. शिवाय, विणकरांच्या नफ्यातही 5 ते 7 टक्क्यांची घट अपेक्षित असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.
भारताची कापसाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होते आहे. 2021-22 मध्ये 352 लाख बेल्स कापसाचे उत्पादन झाले होते. 2021-22 मध्ये कापूस हंगामात हे उत्पादन घटून 315 लाख बेल्सवर खाली आले. याच दरम्यान कापसाच्या किमतीत मात्र 39 टक्क्यांची वाढ झाली. 2020-21 मध्ये 110 रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा कापूस 2021-22 मध्ये 154 रुपये प्रतिकिलो दरापर्यंत गेला.
कापूस उद्योगावर दरवाढीचा परिणाम
उत्पादन घटीचा आणि दरवाढीचा परिणाम कापूस उद्योगावर झाला आहे. या नव्या कापूस हंगामात कापसाचे उत्पादन तुलनेने मोठ्या प्रमाणात वाढेल, असे संकेत आहेत. यामुळे कापसाच्या दरात घट होऊन कोव्हिड पूर्वीच्या दरापर्यंत कापूस खाली आला, तर निर्यातीला पुन्हा चालना मिळू शकते, असे या संस्थेचे मत आहे