कोल्हापूर : दोन वर्षांनी भाविकांसह पालखी सोहळा

कोल्हापूर : दोन वर्षांनी भाविकांसह पालखी सोहळा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

आकर्षक सजावटीने सजविलेली पालखी, पारंपरिक लवाजमा, देवीचा अखंड जयघोष यासह हजारो भाविकांची उत्साही उपस्थिती अशा भक्तिमय वातावरणात शुक्रवारी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा पालखी सोहळा झाला. कोरोनानंतर मंदिराचे चारही दरवाजे खुले झाल्याने मंदिर परिसरात येऊन आबालवृद्धांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर देवीचा आठवड्याचा पालखी सोहळा पूर्ववत सुरू झाल्याबद्दलचे समाधान भाविकांमधून व्यक्त होत होते.

कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. तेव्हापासून मंदिरातील सर्व पारंपरिक व धार्मिक विधी प्रतीकात्मक व साधेपणाने आणि मोजक्या मानकर्‍यांच्या उपस्थित सुरू होते. कोरोनाचा कहर कमी झाल्याने मंदिर टप्प्याने खुले झाले. लोकभवानेचा आदर राखत प्रशासनानेही ई-पास बंद करून मंदिराचे सर्व दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शुक्रवारी देवीचा पालखी सोहळा दोन वर्षर्ंनंतर भाविकांच्या उत्साही उपस्थितीत पार पडला. लोकांनी हा सोहळा आपल्या मोबाईलमध्ये आवर्जुन साठवून घेतला.

सलग सुट्ट्यांमुळे गर्दी

दरम्यान, या आठवड्यात शुक्रवारी धुळवड, शनिवार व रविवार तसेच सोमवारच्या औद्योगिक सुटीमुळे सलग चार दिवस सुट्ट्या आल्या आहेत. यामुळे देशभरातील भाविक-पर्यटक मोठ्या संख्येने कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यामुळे अंबाबाई मंदिरासह शहरातील सर्वच पर्यटन स्थळांवर गर्दी झाली होती. देवीचा वार असल्याने शुक्रवारी अंबाबाई मंदिरात ओटी भरण्यासाठी तसेच रात्री पालखी सोहळ्यालाही पर्यटकांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.

देवीची ओटी भरत आनंदोत्सव साजरा

दरम्यान शुक्रवारी हिंदूत्ववादी संघटना व श्री अंबाबाई भक्तांच्या वतीने मंदिराचे चारही दरवाजे खुले करून भाविकांना ई-पास मुक्त प्रवेश दिल्याबद्दल आनंदोत्सव म्हणून देवीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर सर्व भक्तांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासोबत मंदिरात राहिलेल्या इतर सुविधांबाबत चर्चा केली.

यात व्हीआयपी व्यक्तीप्रमाणेच सर्वसामान्य भाविकांनाही पूर्वीप्रमाणे मंदिरातील पितळी उंबर्‍याच्या आत दर्शनास परवानगी मिळावी, सुरक्षेच्या नावाखाली लावलेले अतिरिक्त बॅरिकेट्स काढून दर्शनाचा मार्ग प्रशस्त करावा, त्यासोबत पावसाळा येण्यापूर्वी मनकर्णिका कुंडाचे काम लवकरात-लवकर मार्गी लागावे, आदी गोष्टींवर चर्चा करण्यात आली.

याबाबत येत्या दोन दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि अंबाबाई भक्तांची बैठक आयोजित करण्याबाबत ठरले. यावेळी महेश उरसाल, सुनील पाटील, प्रमोद सावंत, रणजित आयरेकर, प्रकाश सरनाईक, गुरुदत्त म्हाडगुत, उदय भोसले, गीता हासुरकर,मयुरी उरसाल, ऐश्वर्या मुनिश्वर आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news