

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ऊसतोड मजूर, साखर कारखान्यांवरील मजूर, वीटभट्टी कामगारांसोबत त्यांच्या मुलांचीही फरफट होताना दिसून येते. 'अवनि' सामाजिक संस्थेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात जिल्ह्यात 0 ते 18 वयोगटातील 2,495 मुले अशा ठिकाणी मिळून आली. ही मुले शाळाबाह्य असून, शिक्षणापासून दुरावलेल्या या मुलांना पुन्हा ज्ञानगंगेत आणण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.
हंगामी स्थलांतरित मजुरांसोबत त्यांची मुलेही फिरतात. अनेकदा ही मुले बालमजूर म्हणून येथे राबताना नजरेस पडतात. अशात त्यांचा शिक्षणाचा मूलभूत हक्क ती गमावून बसतात. यासाठी जिल्ह्यात एक सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 11 साखर कारखाने व वीट्टभट्ट्यांवर 0 ते 18 वयोगटातील 2,495 मुले मिळून आली आहेत. 0 ते 3 वयोगटातील 517 बालके, 4 ते 6 वयोगटातील 511 बालके, 7 ते 14 वयोगटातील 1,163 मुले, तर 15 ते 18 वयोगटातील 494 मुले मिळून आली आहेत.
शिक्षणाची जबाबदारी कोणाची?
0 ते 6 वयाच्या मुलांना शासनातर्फे पूरक पोषण आहार मिळणे गरजेचे आहे. तसेच 7 ते 18 वयोगटातील जी मुले शिक्षणापासून दुरावली आहेत, अशांसाठी शिक्षणाचे धडे देण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. स्थलांतरित व हंगामी शाळाबाह्य बालकांना हक्क मिळवून देण्यासाठी 'अवनि' संस्था प्रयत्नशील असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी सांगितले. यावर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही संस्थेने दिला आहे.