कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यासाठी राज्य सरकार पुढील शैक्षणिक वर्षापासून केरळचा शैक्षणिक पॅटर्न राबवणार आहे. तिसरीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक सराव परीक्षा सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होते. या निर्णयामुळे अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागण्यास मदत होईल, असे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना वाटते.
सध्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या अकारिक व संकलिक मूल्यमापन चाचणी घेतल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना परीक्षा नसल्याने अभ्यासाची गोडी राहिली नाही. भविष्यातील बदलती शिक्षण पद्धती व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या पार्श्वभूमीवर हा निर्णय सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर याबाबत सकारात्मक असून लवकरच घोषणा करणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्षापासून तिसरीपासून परीक्षा घेण्याचा घेतलेला निर्णय योग्य व स्तुत्य आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वाचन आणि लेखन या दोन्ही गोष्टी न झाल्याने विद्यार्थ्यांची प्रगती खुंटली आहे. आता शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. केरळच्या धर्तीवर सरकारने तिसरीपासून परिक्षा घेण्याचा घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे.
– एस. डी. लाड, अध्यक्ष, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठशासन केरळच्या धर्तीवर आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरीच्या वर्गापासून परीक्षा पद्धत अवलंबणार आहे. यापूर्वी आपणाकडे अशा प्रकारच्या परीक्षा पद्धती अस्तित्वात होत्या. त्यामुळे विद्यार्थी मन लावून अभ्यास करायचे, शिक्षक विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेत होते. परीक्षा पद्धत पुन्हा आली तर विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल.
– छाया अर्जुन पाटील, अध्यापिका, विद्यामंदिर मौजे तासगाव. (ता.हातकणंगले)1 ली ते 8 वी पर्यंत परीक्षाच नाही हे शासनाचे म्हणणे चुकीचे आहे. आकारिक व संकलित मूल्यमापनानुसार परीक्षा होतच आहेत. फक्त आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करायचे नाही हा नियम शासनाने रद्द करावा. 3 री पासून केरळ पॅटर्ननुसार परीक्षा घेण्याचे शासनाने ठरविले आहे. यामध्ये विद्यार्थ्याला पुढील वर्गात प्रवेश देणे ही पद्धत नसावी. परीक्षेची काठिण्य पातळी जास्त नसावी.
– संतोष आयरे, समन्वयक, राज्य शिक्षक सेनातिसरीच्या वर्गापासून परीक्षा घेण्याचे शासनाने ठरविले आहे, पण गेली दोन वर्षे कोरोनामुळे आम्ही पूर्ण वेळ शाळेतच जाऊ शकलो नाही. त्यामुळे काही विद्यार्थी अभ्यासात मागे पडले आहेत. याचा विचार करून शासनाने नवीन परीक्षा पद्धती सुरू करताना योग्य ती उपाययोजना करावी. जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अवघड होणार नाही.
– प्राची गिरी, विद्यार्थिनी (तिसरी), वसंतराव चौगुले विद्यामंदिर