![कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी रेखावार यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F09%2F%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेतली. यावेळी रेखावार यांनी डॉ. जाधव यांच्याशी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास, थेट पाईपलाईन, खराब रस्ते, विमानतळ विस्तारीकरण यांसह विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी रेखावार यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राज्यातीलच नव्हे तर देशातील विविध राजकीय, सामाजिक घटनांचे आपण साक्षीदारच नव्हे, तर त्यातील अनेक घटनांतील प्रत्यक्ष सहभागी असल्याचे सांगत जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपल्या अनुभवाचा फायदा होईल, असेही रेखावार यांनी सांगितले.
डॉ. जाधव यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र विकासासह जिल्ह्याचा विकास आराखडा तसेच थेट पाईपलाईनप्रश्नी प्रशासकीय प्रमुख म्हणून गती द्या, असे सांगत कोल्हापूर विमानतळाचा विकास वेगाने झाला पाहिजे. धावपट्टी विस्तारीकरणासाठी आवश्यक अतिरिक्त 64 एकर जागेची भूसंपादन प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
लोकराजा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी, दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा, ऊसदर आंदोलन आदींमध्ये प्रशासकीय भूमिका, तत्कालीन परिस्थिती, सामाजिक जाणिवा यांचा संगम साधत झालेली प्रश्नांची सोडवणूक आदींसह जिल्ह्यातील सध्याच्या विविध प्रश्नांबाबत डॉ. जाधव आणि रेखावार यांच्यात चर्चा झाली. यावेळी दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील उपस्थित होते.