कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी निघालेल्या दिंडीत कार घुसल्याने झालेल्या अपघात मरण पावलेल्या जठारवाडी (ता. करवीर) येथील मृत वारकर्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांची आ. हसन मुश्रीफ यांनी रविवारी भेट घेेऊन सांत्वन केले. अपघातात जखमी झालेल्या वारकर्यांचीही त्यांनी विचारपूस केली. यावेळी आ. मुश्रीफ यांनी हसन मुश्रीफ फाऊंडेशनकडून मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची आर्थिक मदत जाहीर केली.
जठारवाडी येथील सहा वारकर्यांचा पंढरपूरला जाताना अपघाती मृत्यू झाला. काही वारकरी जखमी झाले आहेत. निधन झालेल्या वारकर्यांच्या कुटुंबीयांचे तसेच जखमी वारकर्यांची भेट घेऊन आ. मुश्रीफ यांनी सांत्वन केले. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रदीप पाटील-भुयेकर, सरपंच नंदकुमार खाडे, सुरेश पाटील, संभाजी पाटील, शहाजी जठार, बाळासाहेब पाटील, प्रभाकर काशीद, शीतल मगदूम आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी मृतांचे कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.