

Kolhapur News
नागाव : पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाचे घरातून अपहरण करून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात पुलाची शिरोलीतील सात जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रामचंद्र शंकर जाधव (वय ५७, रा. बालाजी पार्क, पेठवडगाव, ता. हातकणंगले यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. त्यानुसार प्रशांत उबाळे, आदिनाथ नरसिंगे, रोहित शहाजी सातपुते, प्रताप शिवाजी भोरे, अली तानेखान, विशाल कांबळे, अनिकेत कांबळे (सर्व रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) तसेच एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्या कुटुंबातील भाडेकरूच्या मुलाबाबत चौकशी केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी, त्यांची पत्नी आणि मुलगा ऋत्विक यांना धमकावत त्यांचे मोबाईल फोन हिसकावून घेतले. तसेच ऋत्विक जाधव याचे जबरदस्तीने अपहरण करून त्याला वाहनातून शिरोली तसेच सादळे–मादळे (ता. करवीर) घाट परिसरात नेण्यात आले.
तेथे आरोपींनी ऋत्विक यास जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. जखमी तरुणास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यानंतर या प्रकरणाची तक्रार पेठवडगाव पोलिसांकडे नोंदविण्यात आली. या घटनेमुळे पेठवडगाव व पुलाची शिरोली परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास वडगाव पोलीस करीत आहेत.