

कोल्हापूर : गेल्या दशकभरात महाराष्ट्राच्या साक्षरतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) आकडेवारीनुसार, ७ वर्षे व त्यावरील वयोगटातील राज्याचा सरासरी साक्षरता दर ८७.३ टक्के झाला आहे. २०११ च्या जनगणनेतील ८२.३४ टक्क्यांच्या तुलनेत ही ४.९६ टक्के बिंदूंची वाढ आहे. विशेष म्हणजे राज्यात महिला साक्षरतेचे प्रमाण गेल्या दशकात तब्बल ६.९३ टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारी सांगते.
ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता ९१.५ टक्के, तर महिला साक्षरता ८२.८ टक्के आहे. २०११ मध्ये पुरुष साक्षरता ८८.३८ टक्के आणि महिला साक्षरता ७५.८७ टक्के होती. म्हणजेच पुरुष साक्षरतेत ३.१२, तर महिला साक्षरतेत तब्बल ६.९३ टक्के बिंदूंची वाढ झाली आहे. हा अत्यंत सकारात्मक आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख दर्शवणारा टप्पा मानला जातो.
ग्रामीण-शहरी दरीचे आव्हान कायम
राज्याची एकूण साक्षरता वाढली असली तरी ग्रामीण व शहरी भागातील साक्षरतेतील तफावत मात्र पूर्णपणे दूर झालेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाची उपलब्धता, महिलांचे शिक्षण व शाळांतील गळती रोखणे ही पुढील काळातील महत्त्वाची आव्हाने ठरणार आहेत. अर्थात, २०११ च्या जनगणनेपासून महिलांच्या साक्षरतेतील वाढ हा आजवरचा सर्वात ठळक बदल ठरला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने केवळ एकूण साक्षरतेचा दर वाढवला नाही, तर पुरुष-महिला साक्षरतेतील अंतरही लक्षणीयरीत्या कमी केले आहे.
लक्षवेधी
एकूण : ८२.३४% → ८७.३%
: महाराष्ट्राच्या साक्षरतेत ४.९६ टक्के बिंदूंची वाढ
महिला : ७५.८७% → ८२.८% : ६.९३ टक्के बिंदूंची झेप