कोल्हापूर : पायाखालून घसरणार्या वाळूचा अंदाज घेण्याऐवजी साम्राज्य विस्ताराची जी स्वप्ने पाहतात, त्यांची अवस्था 'तेलही गेले आणि तूपही गेले' अशी होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची स्थिती सध्या अशीच झाली आहे. तेलंगणामध्ये त्यांनी लोकप्रिय योजना राबविल्या, पण या योजनेतील भ्रष्टाचाराकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.
याउलट सत्तेची हॅट्ट्रिक साधण्यासाठी स्वतःच्या राज्यात गांभीर्याने उपाययोजना करण्याऐवजी त्यांनी शेजारील महाराष्ट्रात शेतकर्यांचे संघटन उभा करून राज्यातील शेतकरी संघटनेला नवा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेलंगणातील मतदारांनी काँग्रेसच्या हाती सूत्रे देऊन त्यांच्या स्वप्नाला सुरूंग लावला आहे. साहजिकच, महाराष्ट्रात शेतकर्यांच्या एकजुटीत उभी फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला असून, त्यांच्या भारतीय रयत संघटनेच्या भवितव्यापुढेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात शेतकर्यांच्या एकजुटीमध्ये पडणारी ही फूट काही नवी नाही. भाजपनेही यापूर्वी हा प्रयत्न केला. राज्यात सत्ता आणि देशात सत्ता असल्यामुळे एक नवे संघटन उभे राहून भवितव्याला आकार मिळू शकतो, अशी चिन्हे दिसताच शेतकरी संघटनेचे अनेक नेते भाजपच्या गळालाही लागले होते. पाशा पटेल, सदाभाऊ खोतपासून ते भगवान काटेपर्यंत भाजपने त्यांच्या हातात कमळ दिले, पण राजकारणातील पदाशिवाय शेतकर्यांची मोठी मोट बांधण्यात भाजप यशस्वी झाला नाही.