

Vishalgad Amba road bison sighting
सुभाष पाटील
विशाळगड : निसर्गवैभवाने नटलेल्या शाहूवाडी तालुक्यात सध्या मानव आणि वन्यजीव संघर्षाचा एक भीषण अध्याय उलगडत आहे. एकेकाळी घनदाट अरण्याच्या कुशीत वावरणारा महाकाय 'गवा' आता तृष्णेपोटी थेट नागरी वस्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. डोंगरांना लागणारे वणवे आणि आटलेले नैसर्गिक जलस्रोत यामुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला असून, अन्नापेक्षाही पाण्यासाठी होणारी त्यांची वणवण चिंतेचा विषय ठरत आहे.
तालुक्यातील दुर्गम डोंगररांगांमध्ये अज्ञातांकडून लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे वनसंपदा भस्मसात होत आहे. गव्यांचे मुख्य खाद्य असलेले गवत आणि कोवळा पाला जळून खाक झाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी हे कळप शेतशिवारातून आता मानवी वस्त्यांकडे 'कूच' करत आहेत. "जंगलातील पाहुणा आता अंगणात" अशी स्थिती निर्माण झाली असून, हा ढासळत्या पर्यावरणीय संतुलनाचा स्पष्ट संकेत आहे.
वाढत्या तापमानामुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले आहेत. तृष्णेने व्याकुळ झालेले बिबट्या आणि गव्यांसारखे प्राणी नाईलाजास्तव मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. या स्थलांतरामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे सावट आहे. केवळ कागदोपत्री आराखडे न मांडता वनविभागाने प्रत्यक्ष वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठे निर्माण करणे आणि वणवा लावणाऱ्यांवर कठोर कायदेशीर बडगा उगारणे अनिवार्य झाले आहे. प्रशासकीय इच्छाशक्ती आणि जनजागृतीचा अभाव राहिल्यास हा संघर्ष भविष्यात अधिक हिंसक वळण घेण्याची दाट शक्यता आहे.
"वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच अन्न आणि पाणी उपलब्ध झाल्यास, मानवी वस्तीतील त्यांचा वावर आपोआप मर्यादित होईल. यासाठी प्रशासकीय इच्छाशक्ती आणि जनजगृती हीच काळाची गरज आहे.