शिरढोण, पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड -शिरढोण-टाकवडे मार्गावरील बेशिस्त वाहतुकीमुळे लोकांची डोकेदुखी वाढली आहे. दुचाकी, चारचाकीस्वार ओव्हरटेक करताना अपघातांना आमंत्रण देत आहेत. मागील दोन महिन्यामध्ये अपघातात तीन जणांनी जीव गमवला आहे. त्यामुळे या ठिकाणी ओव्हरटेक जीवघेणी बनली आहे. सध्या रस्ता रुंदीकारणाचे काम सुरू असतानाही दुचाकीस्वार-चारचाकी तसेच अवजड वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. द रम्यान वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचा असणारा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. कोल्हापूर तसेच कर्नाटकात जाण्यासाठी कुरुंदवाड शिरढोण इचलकरंजी हा जवळचा मार्ग आहे. तसेच नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र असल्याने भाविक भक्त प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी दत्त दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या मार्गावर वाहतूकीची शिस्त लागणे गरजेचे आहे. याकडे कुरुंदवाड,शिरोळ व इचलकरंजी पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.