कोल्हापूर : मागील चार दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार उडवला असताना सोमवारी मुंबई, ठाणे आणि परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी कोकणात पुराची स्थिती कायम आहे.
तिकडे विदर्भात गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सतत पळत असणारी मुंबई स्लो ट्रॅकवर आली आहे. सोमवारी पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे चहूकडे पाणीच पाणी झाले होते.
दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे पाण्याचा निचरा झाला. मात्र, शहरातील बहुतांश रस्ते वाहतूक कोंडीत सापडले होते. मध्य व पश्चिम रेल्वेची लोकल सेवाही १० ते १५ मिनिट विलंबाने सुरू होती. तुंबलेल्या पाण्यात व पावसामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत बेस्ट बससह अन्य गाड्या अडकून पडल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास लांबला. मध्य व पश्चिम रेल्वेची लोकल सेवाही विस्कळीत झाल्यामुळे वसई-विरार, कल्याण-डोंबिवली येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले.
आगामी पाच दिवसांत कोकणातच पावसाचा जोर राहणार असून, राज्याच्या उर्वरित भागातून पाऊस कमी होत आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पूरस्थिती आहे; मात्र तेथील पाऊस आगामी २४ तासांत कमी होत आहे. गेला आठवडाभर मुंबईसह कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात चांगला पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
सोमवारी विदर्भातील अनेक गावांचा संपर्क तुटला, तर कोल्हापूरमध्ये पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली; मात्र आगामी २४ तासांत राज्यातील रेड अलर्ट कमी झाले आहेत. कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टी गेल्या २४ तासांत कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील बहुतांश भागात २०० मि.मी. पेक्षा ज ास्त पाऊस झाला आहे.. सर्वाधिक पाऊस घाटमाथ्यावरील धारावी २७५, ताम्हिणी २३०, तर महाबळेश्वर येथे २४१ मि.मी. इतका पाऊस झाला. कोकणातील राजापूर येथे २१० मि.मी. पाऊस झाला.
आगामी पाच दिवसांतील अलर्ट (कंसात तारीख)
रेड अलर्ट : रायगड (२४), रत्नागिरी (२३), सातारा (२३)
ऑरेंज अलर्ट: पालघर (२४), ठाणे (२४), रायगड (२३), रत्नागिरी (२४, २५), सिंधुदुर्ग (२३, २४), पुणे (२३, २४), कोल्हापूर (२३), सातारा (२४, २५)
येलो अलर्ट : पालघर (२५), ठाणे (२५, २६), मुंबई (२४, २५), रत्नागिरी (२६), सिंधुदुर्ग (२४.२५), नंदुरबार (२३, २४), जळगाव (२४), नाशिक (२३, २४), पुणे (२५, २६), कोल्हापूर (२४, २५), सातारा (२६), अकोला (२३ ते २६), अमरावती (२४ ते २६), भंडारा (२३ ते २६), बुलडाणा (२६), चंद्रपूर (२३ते २६), गडचिरोली (२३ ते २६), गोंदिया (२३ ते २६), नागपूर (२३ ते २६), वर्धा (२४ ते २६), वाशिम (२३ ते २६)