

शिरढोण : शिरढोण, टाकवडे, जांभळी, हरोली व परिसरातील सोयाबीन पिकावर पानतोड्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतांमध्ये अळ्यांनी सोयाबीनची पाने कुरतडण्यास सुरुवात केली असून, काही ठिकाणी पानांचा मोठा भाग नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिकाच्या वाढीबरोबरच उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या ढगाळ वातावरण व अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शेतकऱ्यांनी दररोज पिकाची पाहणी करून सुरुवातीच्या अवस्थेतच नियंत्रण करणे आवश्यक आहे. अंडी व लहान अळ्या दिसताच त्यांचा नाश करावा. प्रादुर्भाव अधिक असल्यास कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार इमामेक्टिन बेन्झोएट ५ एसजी (०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी) किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी (०.३ मिली प्रति लिटर पाणी) यापैकी योग्य कीटकनाशकाची फवारणी करावी. तसेच शेतात फेरोमोन सापळे लावून अळीच्या वाढीवर नियंत्रण ठेवावे. कृषी विभागाने बाधित गावांची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पानतोड्या अळीपासून बचावासाठी हे करा
पानतोड्या अळी ही सोयाबीनवरील घातक कीड असून ती पानांचे मोठे नुकसान करते. शेताची नियमित पाहणी करा, सुरुवातीच्या अवस्थेत अंडी व अळ्या नष्ट करा, फेरोमोन सापळे लावा आणि प्रादुर्भाव वाढल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने इमामेक्टिन बेन्झोएट ५ एसजी किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी यांची शिफारशीनुसार फवारणी करा. यामुळे उत्पादनाचे नुकसान टाळता येऊ शकते.
...सचिन पाणदारे, कृषी औषध दुकानदार