

नागाव ;- करवीर तालुक्यातील शिये भागात गेल्या काही दिवसांपासून गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून हातातोंडाशी आलेल्या शाळू ( ज्वारी ) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अँडव्होकेट माणिक शिंदे यांनी दिला आहे.
शिये ता. करवीर येथील सादळे मादळे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या दरा परिसरात धाकोबा मंदिराशेजारी युवराज जाधव , चंद्रकांत जाधव , रमेश जाधव , अनिल जाधव , निवृत्ती राऊत , जोतिराम जाधव, विजय जाधव यांच्यासह गावातील अन्य शेतकऱ्यांनी ६ एकर शेतात ज्वारी पिकांची लागवड केली होती . या डोंगराळ पट्ट्यात सध्या शाळू ज्वारीचे पीक जोमात आहे.
मात्र, रात्रीच्या वेळी सादळे मादळे जंगलातून गव्यांचे कळप शेतात शिरकाव करून हाता तोंडाशी आलेल्या शाळू ( ज्वारी ) पिकाची कणसे खाऊन धाटेच शिल्लक राहिले आहेत . या परिसरातून प्रत्येक वर्षी ५० ते ६० क्विंटल शाळू ( ज्वारी ) चे पिक शेतकरी घेत आला आहे पण या वर्षी गव्यांमुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .
वनविभागाच्या अधिकार्ऱ्यांनी या झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व या गव्यांचा बंदोबस्त करा अन्यथा शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर येथील वनविभागाच्या कार्यालयात घुसून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.