कोल्‍हापूर : माजी आमदार फोडून सरकार पडत नसते; राजू शेट्टी यांच्या आरोपांना सरूडकरांचे प्रत्‍युत्‍तर

सत्यजित पाटील-सरुडकर
सत्यजित पाटील-सरुडकर

सरूड : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सरकार पडायला आमदार लागतात. माजी आमदार फोडून कुठलं सरकार पडत नसतं. असे माजी आ. सत्यजित पाटील-सरुडकर यांनी राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेत झालेल्या शिंदेंच्या बंडाळीची पूर्व कल्पना कोणालाही नव्हती. शेट्टींनी केलेले आरोप चुकीच्या माहितीवर आधारीत आहेत. ते माझे जुने मित्र आहेत, त्यांच्यावर मी कोणतीही टीका करणार नाही. असे सांगत माजी आ. पाटील यांनी शेट्टींच्या आरोपाकडे दुर्लक्ष केले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर मविआच्या राजू शेट्टी यांना संभाव्य पाठींब्याची चर्चा मागे पडली. तर उमेदवारी मिळाल्यापासून माजी आ. सत्यजित पाटील यांनी मतदारसंघातील नेत्यांच्या गाठी भेटींचा धडाका लावला आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी माजी आ. सरूडकर हे साखर कारखानदारांनी निवडणुकीत उतरविलेला मोहरा आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी हेच सरूडकर बॅग भरून गोव्यापर्यंत गेले होते. अशी जळजळीत टीका करून शेट्टींनी सरूडकर यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान शिरोळ दौऱ्यावर असणाऱ्या माजी आ. पाटील यांना या आरोपाबाबत काही पत्रकारांनी छेडले असता 'माझे घराणे राजकीय आहे. मी चार विधानसभा निवडणुका लढलोय. आता पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलोय. तसेच मी कोणत्या सहकारी संस्थेचा साधा संचालकही नाही. तर हाडाचा शेतकरी आहे. अशावेळी शेट्टींनी मला करखानदारांचा मोहरा म्हणणे चुकीचे आहे. सहकारी साखर कारखानदारी नसती तर अख्ख्या महाराष्ट्राचा विकास झाला नसता. कारखानदार हे काय समाजाचे शत्रू नाहीत. शेट्टींना देखील आम्ही शत्रू मानत नाही. माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी जुळलेली आहे. मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडणुकीत उतरलोय.

मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडावेळी बॅग भरून तुम्ही गोव्यापर्यंत गेल्याचा आरोपही शेट्टींनी तुमच्यावर केल्याचे पत्रकारांनी सांगताच माजी आ. पाटील यांनी उत्तरादाखल आपण सगळेच गोव्याला जात असतो. फोडाफोडी बद्दल म्हणाल तर माजी आमदारांना फोडून सरकार पडत नसते. त्यांनी माझ्यावर काय आरोप केला माहीत नाही. मात्र, त्या घडामोडीचा कोणालाच थांगपत्ता नव्हता. माजी आमदारांना मताचा अधिकारही नसतो. हे त्यांनाही माहीत आहे. माझी निष्ठा पक्की असल्याने विरोधी गटातील माझ्या मित्रांनी मला कोणतीही ऑफर देण्याचे धाडस केले नाही. सरकार आणि सामान्य माणूस यांच्यातील एक चांगला दुवा होणे हा माझा मुख्य उद्देश आहे. असे म्‍हणत त्यांनी आपल्या उमेदवारीचे समर्थनही केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news