कागल : गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूमिकेविषयी उलटसुलट चर्चेत असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील नेते समरजित घाटगे राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत. गेले दोन दिवस ते मुंबईमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. ते नेमकी भूमिका कोणती घेतात आणि राजकीय दिशा कशी ठरवतात याकडे तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कागल विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यक्रमाचा धडाका सुरू आहे. गावोगावी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तर कागल शहरातील अनेक घरात जाऊन त्यांनी रक्षाबंधन साजरे केले. त्यांच्या उमेदवारीमुळे ना. हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे अशी थेट लढत होणार आहे. गेल्या विधानसभेची निवडणूक तिरंगी झालेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हसन मुश्रीफ, शिवसेनेकडून संजय घाटगे आणि अपक्ष म्हणून समरजित घाटगे अशी तिरंगी लढत झालेली होती.
मुश्रीफांना 1 लाख 16 हजार 434 तर संजय घाटगे यांना 55 हजार 657 इतकी मते मिळाली होती. अपक्ष लढलेले समरजित घाटगे यांना 88 हजार 302 इतकी मते मिळाली होती. दरम्यान, माजी आमदार शिवसेना (उबाठा) चे नेते संजय घाटगे यांनी यापूर्वीच निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करून हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी राहणार, असा पवित्रा घेतला आहे. संजय घाटगे यांच्या भूमिकेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे, तर माजी खासदार संजय मंडलिक यांनी आपण महायुतीमध्ये असल्याने युतीची भूमिका तीच आपली भूमिका, वेगळी भूमिका नाही असे स्पष्ट करून हसन मुश्रीफ यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुश्रीफ यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार देण्याकरिता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नाचा भाग म्हणूनच समरजित घाटगे यांच्याशी पवार गटाच्या नेते मंडळींनी संपर्क साधला असल्याची चर्चा आहे; मात्र समरजित घाटगे तुतारीबरोबर जाणार की, भारतीय जनता पक्षामध्ये राहणार किंवा पक्ष त्यांच्यावर वेगळी जबाबदारी देणार हे नजीकच्या काळात दिसून येणार आहे.