शिरटी : पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी तुटलेल्या उसाला कारखान्याने प्रतिटन २०० रुपये द्यावेत, अशी आमची मागणी आहे. जर साखर कारखानदारांनी हे उसाचे पैसे नाही दिले तर, ते पाताळात जाऊन बसले तरी, पैसे वसूल केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. शिरटी (ता. शिरोळ) येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित केलेल्या सभेत शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबुराव चौगुले होते.
शेट्टी म्हणाले की, सत्ताधारी राज्यकर्ते व विरोधकांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रस नाही, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या कारखानदारांच्यात रस आहे. राज्यात मागासवर्गीय, ओबीसी विद्यार्थ्यांची ३ हजार ३०० कोटींची स्कॉलरशिप थकीत आहे. ही रक्कम जरी सरकारला लहान वाटत असली तरी शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या दृष्टीकोनातून ही रक्कम मोठी आहे. त्यामुळे एकीकडे सरकार लाडकी बहिणीचे लाड करत असताना भाचा मात्र शिक्षणापासून वंचित राहायला लागला आहे, हा प्रश्न विचारण्याची गरज आहे
दरम्यान, माजी. खा. राजू शेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून मंत्री गिरीश महाजन यांच्या फंडातून ५० लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सरपंच राहुल सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात, ग्रामपंचायतीमार्फत गावात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावातील विविध मान्यवरांचा तसेच शालेय विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आलम मुल्लानी यांनी केले.
यावेळी सरपंच शुभांगी शिरगावे, उपसरपंच प्रकाश माळी, माजी पं. स. सदस्य सचिन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अनिता चौगुले, सतीश चौगुले, राजकुमार शिरगावे, अमित शिरगावे, प्रमोद उदगावे यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.