कोल्हापूर : सरकारने 15 नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याची सूचना केली आहे. त्याआधी कारखाना सुरू केल्यास प्रती टन 500 रुपये दंडाचा आदेश साखर कारखान्यांना सरकारने दिला आहे. हा आदेश साखर कारखानदार धुडकावून लावणार असतील, तर ते सरकारपेक्षा मोठे झालेत काय? मग आम्हीपण ठरवतो काय करायचे ते, आमच्या हातात उसाचा बुडका आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
शेट्टी म्हणाले, जयसिंगपूर येथे 23 वी ऊस परिषद 25 ऑक्टोबरला होणार आहे. गेल्या वर्षी दीर्घकाळ लढा लढून आम्ही 2022-23 मध्ये तुटलेल्या उसाला 100 रुपये मिळविले आहेत. आठ महिन्यांच्या लढाईनंतर शासनाने निर्णय केलेला आहे. आता 2023-24 च्या हंगामामध्ये शेतकर्यांनी पुरविलेल्या उसाचे 200 रुपये कारखान्यांकडून घ्यायचे आहेत. मागील वर्षी साखरेचे भाव साधारणपणे 3650 रुपये, बगॅस, बी हेवी आणि सी हेवी मोलॅसिसचाही भाव वाढला आहे. पर्यायाने स्पीरिट आणि अल्कोहोलचे दर वाढले आहेत. त्यामुळे 200 रुपये साखर कारखाने अजून देऊ शकतात.
हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर कारखान्यांनी मागील उसाचा अंतिम भाव 200 रुपये द्यावा, अशी मागणी देखील खा. शेट्टी यांनी केली. यावेळी सावकार मादनाईक व पदाधिकारी उपस्थित होते. 12 टक्के रिकव्हरी असणारा माळेगाव साखर कारखाना 3600 रुपये देत असेल, तर साडेबारा आणि तेरा टक्के रिकव्हरी असणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना दर देण्यास धाड भरली काय? 15 नोव्हेंबरला कारखाने सुरू होणार आहेत. कारखान्यांना दराचा निर्णय घेण्यासाठी अवधी आहे. या कालावधीत त्यांनी निर्णय घेतला नाही, तर परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी, असा दमही त्यांनी कारखानदारांना दिला.