कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची शुक्रवारी (दि. 29) होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता आहे. पोटनियमाआडून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा सताधार्यांचा प्रयत्न आहे. तर काही पोटनिमातील महत्त्वपूर्ण दुरुस्त्यांमुळे एकाधिकारशाही निर्माण होईल, अशी चिंता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
सात तालुक्यांतील 122 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याच्या पोटनिमात दुरुस्तीवरून चेअरमन माजी आमदार अमल महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा असल्याचे अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे म्हटले होते.
श्री छ. राजाराम कारखान्याची वार्षिक सभा शुक्रवार, दि. 29 रोजी होत आहे. ज्या सभासदांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांची रितसर लेखी उत्तरे प्रश्नकर्त्या सभासदांना रजिस्ट्रर पोस्टाने पाठविली आहेत. याशिवाय कारखान्याच्या छ. राजाराम अॅपवर सर्व सभासदांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली आहेत. या व्यतिरिक्त अधिक खुलासेवार माहिती वार्षिक सभेच्या वेळी दिली जाईल असे चेअरमन अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.