![कोल्हापूर : राजापूर बंधारा झाला पाण्याविना खुला; नदीपात्र बनले कोरडे मैदान](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F03%2F14-2-6.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : राजापूर (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीवरील बंधारा पूर्ण क्षमतेने खुला झाला आहे. गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने त्याची झळ आत्तापासूनच जाणवू लागली आहे. यापूर्वी 2019 व 2021 सालापासून महापुराची धास्ती घेतलेल्या शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना भविष्यात पाण्यासाठी वणवण करावी लागणार का, अशी परिस्थिती आताच निर्माण झाली आहे.
नेहमी तुडुंब भरून वाहणारा राजापूर बंधारा आणि या राजापूर बंधार्यातूनच पंचगंगा नदीला बॅक वॉटर मिळून शिरोळ तालुक्यातील शेतीला आणि पेयजल योजनेला मुबलक पाणी मिळते. मात्र गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात पाणी नसल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीचीही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. राजापूर बंधारा ते नृसिंहवाडी देवस्थानपर्यंत पाणी पातळीत कमालीची घट होऊन गौरवाड पाणवठा, राजापूर बंधारा परिसरात जलसाठा कमी झाला आहे. वाळू खुली झाल्यामुळे वाळू चोरीचा प्रकार सुरू झाला आहे. शेतकर्यांना पिके टिकवण्यासाठी नदीतून चर मारून पाण्याचा उपसा करून शेतीला पाणी द्यावे लागत आहे.