कोल्हापूर : शहरातील पूरग्रस्त भागाचे सोमवारपासून पंचनामे करण्यात येणार आहेत. यासाठी 33 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात एक तलाठी, आयटीआय, महापालिका कर्मचार्यांसह महापालिका अभियंता, पर्यवेक्षीय अधिकारी असे 178 कर्मचारी तैनात केले असून, त्यांच्यावर महापालिका उपायुक्त पंडित पाटील नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
दरम्यान, शहरात आलेल्या महापुराने आतापर्यंत सुमारे 10 हजारांवर नागरिक बाधित झाले आहेत. महापुराच्या भीतीने अनेक नागरिकांनी नातेवाईक, मित्रांकडे स्थलांतर केले आहे. महापालिकेने सुमारे एक हजार नागरिकांचे निवारा केंद्रांत स्थलांतर केले. नागरिकांचे राहत्या घरातील प्रापंचिक साहित्यासह व्यापारी, विक्रेते आदींचे दुकाने, टपर्या आदीमध्ये पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. शहरात कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरातील महावीर कॉलेज परिसर, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी, सुतारवाडा, सीता कॉलनी, सिद्धार्थनगर, पंचगंगा तालीम, धनवडे मठ, दुधाळी परिसर, सुतार मळा, जिव्हाळा कॉलनी, मुक्तसैनिक वसाहत, जाधववाडी, बापट कॅम्प, उलपे मळा, कदमवाडी-जाधववाडी, लोणार वसाहत आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. या ठिकाणी अनेक घरांत, दुकानांत पाणी गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
शहरातील पूरग्रस्त भागाचे क्षेत्र मोठे आहे. यामुळे शहरातील पंचनामे तातडीने करण्यात येणार आहेत. करवीर तालुक्यातील अन्य तलाठ्यांसह 178 कर्मचार्यांकडून पंचनाम्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. एका पथकात सहा जणांचा समावेश आहे. सोमवारी (दि. 29) पंचनाम्याला सुरुवात होणार आहे. तीन ते चार दिवसांत संपूर्ण पंचनामे पूर्ण होतील, अशी शक्यता आहे.
राज्य शासनाच्या निकषानुसार देय असलेले सानुग्रह अनुदान पंचनामे पूर्ण होताच तत्काळ देण्यात येणार आहे. तसे नियोजन करण्यात आले आहे.
पंचनामा प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. नुकसान झालेल्या परिस्थितीचे फोटो घेऊन ते जिओ टॅगिंग करून कुटुंबमालकाच्या नावे सेव्ह केले जाणार आहेत. पूरग्रस्तांकडून बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, बँक आयएफसी कोड, आधार कार्ड सुस्पष्ट दिसतील अशा झेरॉक्स प्रती घेतल्या जाणार आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अंतिम यादी विहित नुमन्यात सादर केली जाणार आहे. ती कर सहायक यांच्याकडून अचूक तयार करून घेतली जाणार आहे. त्यावर सर्व अधिकारी, कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक पथकाला नेमून दिलेल्या क्षेत्रात एकही नुकसानग्रस्त व्यक्ती पंचनाम्यापासून वंचित राहिला नसल्याचे पथकातील सर्व अधिकारी, कर्मचार्यांनी स्वाक्षरी करून प्रमाणपत्र सादर करायचे आहे.