

कुरुंदवाड : पंचगंगा नदीच्या प्रदूषणप्रश्नी प्रशासनाकडून सकारात्मक हालचाली सुरू झाल्याने १ मे रोजी जाहीर केलेले उपोषण व इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा रोखण्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती आंदोलन अंकुश प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, “२७ तारखेला झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जनहित लक्षात घेऊन आंदोलन पुढे ढकलले आहे. मात्र मैलायुक्त सांडपाणी विना प्रक्रिया नदीत सोडणे तात्काळ थांबवून ते एसटीपी प्रकल्पाकडे वळवावे. तसेच प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे अशी चर्चा झाली आहे.
टाकवडे वेस येथील काळ्या ओढ्यावर सुरू असलेल्या बांधकामाबाबत मजबूत व उंच कायमस्वरूपी बांध उभारण्याची मागणी केली.आश्वासनांची पूर्तता न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा देत चुडमुंगे म्हणाले,
“बांधकाम थांबविणे, प्रदूषित पाणी सोडणे किंवा समितीचे काम बंद केल्यास इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखून कुरुंदवाड येथे आंदोलन छेडू. असा इशारा दिला. यावेळी आयुब पट्टेकरी, सुनील कुरुंदवाडे, राकेश जगदाळे, प्रभाकर बंडगर, बंडू बरगाले, रशीद मुल्ला उपस्थित होते.