कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नवीन बेड करण्याबरोबरच इतर दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी बेड अपुरे पडत आहेत. परिणामी दुसर्याच दिवशी रक्षाविसर्जन करावे, असे आवाहन कर्मचार्यांकडून केले जात आहे.
पंचगंगा स्मशानभूमीतील 12 बेड खराब झाले आहेत. त्याबरोबरच स्मशानभूमीवरील पत्रे फाटलेले आहेत. पावसाळ्यात स्मशानभूमीची अवस्था दयनीय होते. त्यामुळे महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. 54 लाख निधीतून 1 ते 12 क्रमांकापर्यंतचे बेड नवीन केले जात आहेत. पाण्याच्या नळांच्या दुरुस्तीबरोबरच इतरही किरकोळ दुरुस्तीचे कामे करण्यात येत आहेत.
महापालिकेच्या वतीने शहरात पंचगंगा स्मशानभूमीसह कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभूमी आहेत. याठिकाणी मोफत अंत्यसंस्काराची सेवा दिली जाते. शहराबरोबरच जवळपासच्या ग्रामीण भागातील मृतदेहावर याठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात. पंचगंगा स्मशानभूमीत दररोज सुमारे 20 ते 25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असल्याने बेड अपुरे पडत आहेत.