

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड-आंबा मार्गावरील मानोली लघु मध्यम प्रकल्प आर्द्रा नक्षत्राच्या जोरदार पावसाने रविवारी सकाळी १० वाजता १०० टक्के 'ओव्हर फ्लो' झाला. सांडव्यातून १०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मानोली धबधबाही ओसंडून वाहू लागला आहे. तालुका प्रशासनाने धरण व धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असून पर्यटकांनी इकडे फिरकू नये, असे आवाहन कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी केले आहे.
मानोली धरणाची पाणी साठवण क्षमता ५.२० दलघमी आहे. गतवर्षी मानोली प्रकल्प २६ जून रोजी ओव्हर फ्लो झाला होता. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने मानोली व कडवी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तालुक्याच्या पश्चिम भागात हे धरण येते. या भागात रोप लावणीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असतो. पावसाने जोर धरल्याने भागातील रोप लावणीस वेग आला असून शेतकरी रोप लावणीच्या कामात गुंतले आहेत. निसर्गसौदर्याचा अप्रतिम नजारा येथे असल्याने पर्यटकांची या धरणाला अधिक पसंती असते.
पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक धरण परिसरात गर्दी करण्याची शक्यता आहे. मात्र, सुरक्षेचे कारण लक्षात घेता सदर धरण क्षेत्र हे निषिद्ध क्षेत्र घोषित करण्यात आले असून, पर्यटकांना येथे येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
पर्यटकांना सावधानतेचा इशारा मानोली धरण ओव्हर फ्लो झाल्याने येथील धबधबा कोसळू लागला आहे. दरवर्षी पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे येथे पर्यटकांना जीव गमवावा लागतो. असे प्रकार घडू नये म्हणून जलसंपदा विभागाने धबधब्याच्या ठिकाणी सावधानतेचा इशारा दिला आहे. पर्यटकांनी प्रवाहाजवळ जाण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये. स्वतःसह, मित्र परीवार तसेच कुटुंबाची काळजी घ्यावी.
खंडेराव गाडे, शाखा अभियंता, कडवी धरण