

अरविंद पाटील
धामोड : मनुष्यबळाचा अभाव, गावांची वाढती लोकसंख्या, विस्तारीकरणामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामाची गती मंदावली आहे. नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार खेटे मारावे लागतात. त्यामुळे आणखी किती दिवस त्रास सहन करावा लागणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. कार्यालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांची कामे रखडली असून कार्यरत कर्मचाऱ्यांना नित्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
जमिनीची मोजणी, शेतजमिनीची मोजणी करणे, हद्द निश्चित करणे, पडीक किंवा वाटप झालेल्या जमिनीची पोटहिस्सा मोजणी करणे, अभिलेख अद्ययावत करणे, जमिनीच्या खरेदी-विक्री, वारसाहक्क किंवा बक्षीसपत्राद्वारे होणाऱ्या बदलांची नोंद करणे.७/१२ आणि ८अ उतारे संगणकीकृत करून उतारे तयार करणे, दुरुस्ती करणे आणि वितरित करणे. नकाशे तयार करणे व जतन करणे, मालमत्ता पत्रिका, नागरी भागातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून मिळकत पत्रिका तयार करणे. आदी कामे भूमी अभिलेख कार्यालयाला करावी लागतात. सद्यपरिस्थितीत ही कामे करताना या विभागाची दमछाक होत आहे.
साधी मोजणी, तातडीची मोजणी, अति तातडीची असे मोजणीचे प्रकार असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यालयातील कामे दिवसेंदिवस प्रलंबित राहत आहेत. अति तातडीच्या मोजणीलाही दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागत आहे तर साध्या मोजणीला एक वर्ष किंवा त्याहून जादा कालावधी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरून दैनंदिन कामे मार्गी लागावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तर आवश्यक पदे भरली जात नसल्याने अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्याचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे या विभागातील सूत्राकडून सांगण्यात येते.