

Dudhaganga River Dry
दत्तवाड : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे दूधगंगा नदीचे पात्र महिन्यात दुसऱ्यांदा कोरडे पडल्याने गावातील नळ पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दत्तवाड हे दूधगंगा नदीवरील शेवटचे गाव असल्याने काळमावाडी धरणातून सोडलेले पाणी मार्गात अनेक ठिकाणी अडवले जाते. त्यानंतर उरलेले पाणीच दत्तवाडपर्यंत पोहोचते. येथे दत्तवाड–मलिकवाड आणि दत्तवाड–एकसंबा हे महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणारे दोन बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमध्ये बर्गे व्यवस्थित बसविल्यास मोठ्या प्रमाणात पाणी अडवले जाते. त्यातून दत्तवाडसह नवे व जुने दानवाड, टाकळीवाडी आणि घोसरवाड या गावांची शेती तसेच पिण्याच्या व दैनंदिन वापराच्या पाण्याची गरज भागवली जाते.
मात्र, सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दत्तवाड, घोसरवाड, टाकळीवाडी, नवे व जुने दानवाड यांसह कर्नाटकातील सदलगा, मलिकवाड, एकसंबा आदी गावांमधून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून दत्तवाड–मलिकवाड बंधाऱ्याची उंची वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी नदीपात्रातील पाणी अडवणे बंद झाले असून सध्या केवळ दत्तवाड–एकसंबा बंधाऱ्याजवळच पाणी अडवले जात आहे. हे अंतर मोठे असल्याने दत्तवाड व घोसरवाड हद्दीत अनेक ठिकाणी नदीपात्र कोरडे पडत आहे. परिणामी या गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
सध्या परिसरात अडसाली लागवड तसेच खोडवा उसाच्या भरणीची कामे जोरात सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खत टाकून उसाची भरणी केली आहे. मात्र नदीपात्रात पाणी नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लवकरच पाणी उपलब्ध झाले नाही, तर ऊस पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दूधगंगा नदीपात्रात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.