

SSC Board Exam 2026
सुभाष पाटील
विशाळगड : गेल्या महिनाभरापासून विद्यार्थ्यांच्या मनावर असलेले परीक्षेचे दडपण बुधवारी भूगोलाच्या शेवटच्या पेपरसोबतच ओसरले. शाहूवाडी तालुक्यातील पाचही परीक्षा केंद्रांवर दहावीच्या बोर्ड परीक्षेची अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात सांगता झाली. 'मिशन बोर्ड' यशस्वी केल्याच्या आनंदात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर गुलालाची उधळण करत आणि एकमेकांना शुभेच्छा देत मोठा आनंदोत्सव साजरा केला.
तालुक्यातील मलकापूर, शाहूवाडी, बांबवडे, वारणा कापशी आणि वारुळ या ५ मुख्य केंद्रांवर हा 'ज्ञानयज्ञ' पार पडला. यंदा एकूण १५३५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. २० फेब्रुवारीला मराठीच्या पेपरने सुरू झालेला हा प्रवास बुधवारी भूगोलाच्या नकाशापूर्तीने पूर्ण झाला. कडक उन्हाळा आणि परीक्षेचा ताण अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत विद्यार्थ्यांनी जिद्दीने पेपर दिले. विशेष म्हणजे, शिक्षण विभागाच्या चोख नियोजनामुळे आणि सीसीटीव्हीच्या करड्या नजरेमुळे संपूर्ण तालुक्यात एकही गैरप्रकार घडला नाही. 'कॉपीमुक्त' आणि 'डिबारमुक्त' परीक्षेमुळे शाहूवाडीच्या शिक्षण क्षेत्राची मान उंचावली आहे.
शेवटची घंटा वाजताच महिनाभराचा थकवा आणि दडपण क्षणात विरून गेले. ज्या हातांनी महिनाभर लेखणी चालवली, त्याच हातांनी हवेत गुलाल उधळला. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे पाय धरून आशीर्वाद घेतले, तर मित्र-मैत्रिणींच्या गळ्यात पडून आनंदाश्रूंनी एकमेकांचा निरोप घेतला. मोबाईलवरील गाण्यांच्या तालावर धरलेला ठेका आजच्या जल्लोषाचे मुख्य आकर्षण ठरले. शालेय जीवनातील हा महत्त्वाचा टप्पा पार पडल्याने विद्यार्थी आणि पालकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
एकूण विद्यार्थी: १५३५
परीक्षा केंद्रे: ५ (सीसीटीव्ही सज्ज)
कालावधी: २० फेब्रुवारी ते १८ मार्च
स्थिती : कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा.
केंद्रनिहाय विदयार्थी असे:
वारुळ (२५२), मलकापूर (२९८), कापशी (२४५), शाहुवाडी (४३५), बांबवडे (३०५), एकूण १५३५ विद्यार्थी.
शाळा सुरू झाल्यापासूनच केलेले नियोजन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे सर्व पेपर सोपे गेले. उत्तम गुणांनी उत्तीर्ण होण्याची मला खात्री आहे.
— राजवर्धन वेल्हाळ (विद्यार्थी, गजापूर)