

Radhanagari Khindi Vharvade Ghat
गुडाळ: राधानगरी राज्य मार्गावरील खिंडी-व्हरवडे घाटात सोमवारी (दि.१८) सायंकाळी एक धोकादायक प्रकार घडला. घाट परिसरातील सावर जातीच्या वाळलेल्या वृक्षाला अचानक आग लागल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने झाडाच्या बुंध्याने काही क्षणांतच मोठा पेट घेतला आणि हा वृक्ष अक्षरशः ‘बर्निंग ट्री’मध्ये परिवर्तित झाला. या घटनेमुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या महाकाय वृक्षाचा बुंधा पूर्णपणे वाळलेला होता. आग लागल्यानंतर काही वेळातच झाडाच्या खोडातून मोठ्या प्रमाणात ज्वाळा बाहेर पडू लागल्या. झाडाचा बुंधा आतून जळत असल्याने हा वृक्ष कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, खिंडी-व्हरवडे येथील तरुणांनी प्रसंगावधान राखत तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी जळत्या झाडाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबवून वाहनांना सुरक्षित अंतरावर रोखून धरले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. काही काळ घाट परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. झाडाच्या पायथ्याशी साचलेला कचरा जाळण्यात आल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर काही नागरिकांच्या मते, पूर्णपणे वाळलेल्या झाडाचे लाकूड सरपणासाठी मिळावे या हेतूने अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावण्यात आली असावी.
घटनेची माहिती संबंधित प्रशासन आणि वन विभागाला देण्यात आली असून, परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक नियंत्रण ठेवण्यात आले आहे. महाकाय वृक्ष हटविण्याचे काम सुरू झाल्यानंतरच वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.