

Radhanagari Yelwade Bee Attack
राशिवडे: येळवडे (ता. राधानगरी) येथे बुधवारी (दि.१५) सकाळी रक्षा विसर्जनाच्या विधीसाठी स्मशानभूमीवर गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी अचानकपणे भीषण हल्ला चढविला. यात माशांनी चावा घेतल्याने १०० हून अधिक ग्रामस्थ, पै-पाहुणे जखमी झाले आहेत. यापैकी बारा जणांना कोल्हापुरातील सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर नैवैद्य शिवण्यासाठी सर्वजण कावळ्यांची प्रतीक्षा करत असताना कावळ्यांसह मधमाशा मोठ्या प्रमाणावर आल्या. यावेळी गावातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. विधी सुरू असतानाच मधमाशांच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांसह पै -पाहुण्यांची धावपळ उडाली.
या हल्ल्यात शिवाजी डोंगळे (घोटवडे) सुहास पाटील, बाजीराव पाटील, श्रीपती पाटील, विश्वनाथ पाटील (सर्व रा. येळवडे), दिनकर पाटील (कोदवडे), पांडुरंग रायकर (मोहडे), विनायक घाटगे (कोल्हापूर), विघ्नेश लोहार (पट्टणकडोली), एकनाथ पाटील (पाटेकरवाडी) गंभीर जखमी झाले. त्यांना राशिवडे आरोग्य केंद्रामध्ये उपचार करुन पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
तर उर्वरित ग्रामस्थ, पै-पाहुण्यांवर राशिवडे आरोग्य केंद्रामध्ये उपचार करुन घरी सोडण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य सागर धुंदरे, पं.स.सदस्या अमॄता पाटील, अशोक पाटील यांनी भेट देऊन चौकशी केली. जखमींवर डॉ. मामुल रशिद, संग्राम शिंदे यांनी उपचार केले.