कोल्हापूर ः शारदीय नवरात्रौत्सव कालावधीत राज्यासह देशभरातील भाविक अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येतात. दररोज लाखाच्या वर भाविक येत असल्याने प्रचंड गर्दी असते. गर्दीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नवरात्रौत्सवासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. त्याबरोबरच दररोज बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून तसेच श्वान पथकाच्या वतीने मंदिर व परिसराची तपासणी करण्यात येणार आहे.
नवरात्रौत्सव कालावधीत नऊ दिवस दररोज अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असणार आहे. देवस्थान समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या 120 सीसीटीव्ही कॅमेर्यांचा वॉच असणार आहे. मंदिराबाहेर पोलिसांनी नियंत्रण कक्ष तयार केला असून तात्पुरती पोलिस चौकी उभारली आहे. मंदिरातील सर्व प्रवेशद्वारांतून मेटल डिटेक्टरमधून तपासूनच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून दररोज सकाळी आणि सायंकाळी मंदिर परिसराची तपासणी होणार आहे. रोज रात्री निघणार्या पालखी सोहळ्यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.