अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सव तयारीला वेग; सोमवारपासून मंदिर स्वच्छता मोहीम
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तीन ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रौत्सवासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तयारीला वेग आला आहे. मंदिर आवारातील गरुड मंडपाचे छत पूर्णपणे उत्तरवण्यात आले असून सोमवारपासून मंदिराची अत्याधुनिक यंत्रणेद्वारे पाण्याचे फवारे मारून स्वच्छता करण्यात येणार आहे.
पुढील आठवड्यात अलंकारांची स्वच्छता
नवरात्रकाळात दररोज अंबाबाईची विविध रूपात सालंकृत पूजा बांधण्यात येते. या पूजेसह देवीच्या विविध धार्मिक विधीनुसार अलंकार परिधान केले जातात. देवीच्या खजिन्यातील सर्व अलंकारांची नवरात्रौत्सवाच्या आधी स्वच्छता करण्यात येते. पुढील आठवड्यात देवीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सव काळात सुमारे २५ लाख पर्यटक व स्थानिक भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सुविधांसाठी बॅग काऊंटर, चप्पल स्टैंड, माहिती कक्ष, लाडू प्रसाद केंद्र यांना प्राधान्य देण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारी असलेल्या दर्शनररांगेच्या बॅरिकेडस्मध्ये वाढ करण्याचे काम सुरू करण्यात आले. नवरात्रकाळात पाऊस आल्यास उपाययोजनेसाठी दर्शनरगित तसेच दर्शनरांग पुलावर छत उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
गेल्यावर्षीपासून मंदिर आवारात गरुड मंडप व नगारखाना या इमारतीच्या पुनर्बाधणीचे काम सुरू आहे. नवरात्रौत्सव काळात मंदिरात होणारी
भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तातडीने गरुड मंडपाचे छत उतरवण्याचे काम करण्यात आले. नवरात्रात दररोज देवीची पालखी प्रदक्षिणा व अष्टमीदिवशी नगर प्रदक्षिणा सोहळा करण्यात येतो. यासाठी देवीच्या उत्सवमूर्तीची पालखी गरुड मंडपात विराजमान असते. मात्र आता गरुड मंडपाचे छत उतरवल्याने या मंडपाच्या चौथऱ्यावर मंडप उभारून याठिकाणी अंबाबाईची सुवर्णपालखी ठेवण्यात येणार आहे.