

सुनील सकटे
कोल्हापूर : शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून महापालिका 190 ते 200 एमएलडी पाणी उपसा करते. नागदेववाडी आणि बालिंगा पंपिंग स्टेशनमधून मीटर बंद ठेवून महापालिका पाणी चोरी करीत असल्याचे उघड झाले.
कोल्हापूर शहरासाठी रोज 250 एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. पण बिलिंग मात्र केवळ 80 एमएलडी पाण्याचे होत असल्याचे सांगण्यात येते. थेट पाईपलाईनद्वारे 180 एमएलडी, बालिंगा 80 एमएलडी आणि नागदेववाडी 30 एमएलडी तर कळंबा तलावातून 10 एमएलडी पाणी उपसा केला जातो.
यावेळी नागदेववाडी आणि बालिंगा पंपिंग स्टेशनवरील पाणी मीटर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे येथून उपसा होणार्या पाण्याचा मेळ लागत नाही. या पंपिंग स्टेशनमधून दररोज सहा एमएलडी पाणी उपसा करण्यास मंजुरी आहे. मीटर बंद ठेवून या दोन्ही पंपिंग स्टेशनमधून तब्बल 21 एमएलडी पाणी उपसा चोरून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मीटर बंद असल्याने जलसंपदा विभागाने विद्युत पंपांच्या हॉर्सपॉवर्सच्या क्षमतेवरून पाणी उपशाची आकडेवारी काढली आहे. या आकडेवारीतून महापालिका पाणी चोरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या थकबाकीवरून महापालिका आणि जलसंपदामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. पाणी तोडण्याची कारवाई करण्यास गेलेल्या अधिकार्यांनी महापालिका अधिकार्यांसमोर ही बाब उघड करताच मनपा अधिकार्यांनी कानाडोळा करीत थकबाकीबाबत बोलण्याचा प्रयत्न केला. चोरीच्या पाण्याचे बिल लावल्यास हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.